‘मुलाकडे काहीच निघाले नाही, तरी त्याला 26 दिवसांची कोठडी, हा कुठला न्याय’ – सुप्रिया सुळे

पुणे – एक आई म्हणून कुठल्याही आईला हा विषय दुःखाचा विषय आहे. कोणत्याही कुटुंबात हे झाले असते, तर दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु, आर्यन खानकडे काहीच मिळाले नाही, अशी माहिती समोर आली आहे. जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला २६ दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असेल तर हा कुठला न्याय आहे ?, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

आर्यनची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर अऩेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आता या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात कात्रजमध्ये झालेल्या नोकरी महोत्सवानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी आर्यन खान २६ दिवसानंतर बाहेर आला. त्या दरम्यान समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील शाब्दिक वाद त्याकडे कसे पाहता, अशी विचारणा केली.

सुळे म्हणाल्या, “मी एक आई म्हणून सुरुवातीला उत्तर देऊ इच्छित असून नंतर लोकप्रतिनिधी म्हणून बोलते. एक आई म्हणून कुठल्याही आईला हा विषय दुःखाचा विषय आहे. कोणत्याही कुटुंबात हे झाले असते, तर दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या मुलाकडे काहीच मिळाले नाही, अशी माहिती समोर आली आहे. जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला २६ दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असल्यास हा कुठला न्याय ? त्यामुळे समाज म्हणून आपण सर्वांनी चिंतन केले पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे. अशा चुकीच्या गोष्टीमुळे बॉलीवूडचं आणि देशाचं नाव एखादा अधिकारी चुकीचे काम करीत असल्यास जगभरात बदनाम होते”.

दरम्यान, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला क्रूझवरील पार्टीप्रकरणी उच्च न्यायालयाने अखेर गुरुवारी जामीन मंजूर केला. परंतु, जामिनाच्या अटींबाबतचा आदेश शुक्रवारी देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याने २५ दिवसांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या आर्यनची शनिवारी सुटका झाली. आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Share to