शेतक-यांच्या दृष्टीने मला आजची सकाळ स्वातंत्र्याची पहाट वाटतेय, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला टोला
नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेतक-यांच्या लढ्याचे कौतुक करत केंद्र सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे.
दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणाव, दबाव आणि दहशतीखाली होता. त्याचं जोखड आता निघालं आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं ? कंगना रणावत सांगते ते स्वातंत्र्य नाही किंवा विक्रम गोखले म्हणतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरचं जोखड निघून जातं, फेकलं जातं. ते स्वातंत्र्य असतं, असा टोला राऊत यांनी लगावला.
तीन काळे कायदे रद्द होत आहेत, शेतकऱ्यांसाठी हा स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं. भिकेत मिळवलेलं नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिलं. जालियनबागेत ब्रिटिशांनी आमच्या वीरांना चिरडलं. त्याच पद्धतीने लखीमपूर खेरीतही या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना चिरडून मारलं. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने मला आजची सकाळ स्वातंत्र्याची पहाट वाटतेय, असंही राऊत म्हणाले.
पोलिसांनी गोळीबार केला… मंत्र्यांनी चिरडलं
राज्यकर्ते कोणी असो. शेतकरी हा आपल्या शेतीचा मालक नसून गुलाम बनविण्याचा हा कायदा होता. नव्या प्रकारची कार्पोरेट जमीनदारी या देशात लादली जाणार होती. ईस्ट इंडिया कंपनी ज्या पद्धतीने या देशात घुसली आणि राज्य आणि देश पारतंत्र्यात टाकला, त्या पद्धतीने भांडवलदारांना नव्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला होता. या देशातील शेतकऱ्यांनी एकजुटीने दीड वर्ष लढा दिला. पोलिसांनी गोळीबार केला… मंत्र्यांनी चिरडले. पण पंजाब हरयाणाचा शेतकरी मागे हटला नाही. मोदी सांगत होते तसे हे शेतकरी दोन राज्यांचेच नव्हते. या दोन राज्यातील शेतकरी देशाच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत होते. शेवटी सरकारला झुकावं लागलं, असं राऊत यांनी म्हटलं आहे.