मराठा आरक्षणासाठी पुणे ते मुंबई ‘लाँग मार्च’ काढणार – छत्रपती संभाजीराजे भोसले
- महाविकास आघाडी सरकारला दिला अल्टीमेटम
पिंपरी (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाचा विषय लगेच सुटणारा नाही. त्याला सहा महिने लागतील किंवा एक वर्षे लागेल. जर सरकारने निर्णय घेतलाच नाही. तर, पुण्यातून मंबईपर्यंत लाँग मार्च काढण्यात येईल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
चिंचवड येथे मंगळवारी (दि. 23) पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत केंद्र, राज्य सरकारची भूमिका काय आहे. हे मी नेहमी आणि स्पष्टपणाने माझ्या भाषणात मांडली आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत राज्यसभेत जाहीरपणाने बोललो आहे. राज्य शासनाची जबाबदारी काय आहे, हेही मी त्यांना सांगितले आहे. आरक्षणाचा विषय लगेच सुटणारा नाही. त्याला सहा महिने लागतील. एक वर्षे लागेल. पण, मागासवर्गीय आयोग स्थापन करावा. जर, आयोग स्थापन करता येत नसेल. तर, कमिटी स्थापन करायला पाहिजे. सर्व्हेक्षण करायला पाहिजे”.
सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी हे पहिले पाऊल आहे. ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. हे काहीच होत नसेल तर केंद्रात आपण जाऊ शकतो. पण, आज केंद्राचा विषय नाही. त्याचबरोबर सरकार मराठा समाजाला पाच मुलभूत सुविधा देऊ शकते. हे मी सांगितले आहे. या मागणीबाबत काही निर्णय झालेला नाही. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे मी ठरविले आहे. परत, सरकारला थोडा वेळ दिला जात आहे. जर त्यात काही निर्णय घेतला नाही. तर, पुण्यातून मुंबईपर्यंत ‘लाँग मार्च काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.
सर्व कामे बंद ठेवून एसटी कामगाराचा दिलासा द्यावा
एसटी कर्मचा-यांना काय देऊ शकता. यावर सरकारने चर्चा करावी. ताबडतोब शिष्टमंडळाला बोलवून घ्यावे. त्यांच्यासोबत चर्चा करावी. किती दिवस ते आझाद मैदानावर बसणार आहेत. एसटी बंद असल्याने सामान्य माणसालाही अडचणी निर्माण झाल्या आहेत. आज सगळ्या एसटी बंद त्यामुळे सामान्य माणसाला त्रास होताना एसटी कामगाराला आनंद होत नाही. त्यामुळे सरकारने बाकीची सगळी कामे बंद करावीत आणि ताबडतोब बैठक लावावी. काय तो मार्ग काढा आणि एसटी कामगाराला दिलासा द्यावा, असे संभाजीराजे भोसले म्हणाले.