सेक्टर 22 संग्रामनगरमधील 104 कुटुंबियांना महापालिकेमार्फत घरे मिळणार

झोपडपट्टी पुनर्वसन बाधितांचा घरांचा प्रश्न निकाली

पिंपरी (प्रतिनिधी) – सेक्टर नं २२ (संग्रामनगर-त्रिवेनिनगर- अंकुश चौक) या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या १०४ कुटुंबांना महापालिकेच्या वतीने हक्काची घरे मिळणार आहेत. नुकत्याच झालेल्या लकी-ड्रॉमध्ये SRA प्रकल्पाअंतर्गत गरिबांना घरे मिळाली आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेतील क्रिडा सभापती उत्तम केंदळे यांनी आज मंगळवारी (दि. 23) पत्रकार परिषदेत सांगितली.   

नगरसेवक उत्तम केंदळे म्हणाले, सेक्टर नं २२ (संग्रामनगर- त्रिवेणीनगर- अंकुश चौक) या झोपडपट्टी भागात ३६५ घरे आहेत. २००९ साली जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निमाण (JNNURM) प्रकल्पांतर्गत  १९३ नागरीक पात्र ठरले होते. २०११ साली दोन सोसायट्याचा लकी-ड्रॉ करण्यात आला होता. घरे मिळालेल्यांचे लोन पास झाले होते. रेड झोनची याचिका दाखल झाल्यामुळे तीन बिल्डिंग तशाच पडून राहिल्या. २०११ चा लकी-ड्रॉ झाल्यापासून आतापर्यंत ४५ आंदोलने, मोर्चे, बेमुदत धरणे आंदोलन करून देखील नागरिकांना न्याय मिळत नव्हता. ऑटो क्लस्टर येथे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यात देखील घरे मिळण्यावर तोडगा निघाला नाही.

आयुक्त हर्डीकर यांची बदली झाल्यानंतर लगेच आयुक्त राजेश पाटील रुजु झाले. त्यांच्यासमोर घराचा प्रश्न उपस्थित केला. आयुक्त नवीन असल्यामुळे त्यांच्यासमोर बैठका व प्रश्न मांडण्यात दोन महिने वेळ गेला. एका झालेल्या बैठकीत राजेश पाटील यांनी तेथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘एसआरए’ प्रकल्प, पीएमवाय योजनांतर्गत किंवा न्यायालयात याचिका दाखल करू असे आश्वासन दिले होते. त्यावर १७ नोव्हेंबर २०२१ रोजी १६० पैकी १०४ लोकांचे लकी-ड्रॉद्वारे विठ्ठलनगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती केंदळे यांनी दिली.  

लाभार्थी संजय वाघमारे म्हणाले, अजंठानगर पत्रा शेड हे 20 ते वर्षापूर्वीचे आहे. नागरिकांचेही लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावे. घरांसाठी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या गाड्या आम्ही अडवलेल्या आहेत. आयुक्तांच्या दालनासमोर आम्ही आमचा संसार थाटून आंदोलने केली. आम्ही अनेक प्रतिनिधी कडे गेलो पण आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. आजरोजी आमच्या घराचा प्रश्न सुटल्याने समाधान वाटत आहे. उघड्यावर पडलेल्या कुटुंबियांना आयुक्त राजेश पाटील यांनी हक्काचा निवारा मिळवून दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते गुलाब पानपाटील म्हणाले, १०४ कुटुंबाचे विठ्ठल नगर येथे पुनर्वसन झाले आहे. अजून अपात्र राहिलेल्या कुटुंबाचेही पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अनेक वर्ष झाले आयुक्त व महापौर यांच्याशी पत्रव्यवहाराद्वारे व प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करत होतो. याचे आज चीज झाल्याचे समाधान वाटत आहे. यात कोणीही राजकारण करू नये. सहकार्य केल्याबद्दल आयुक्त राजेश पाटील व महापौर माई ढोरे यांना धन्यवाद देतो.

नगरसेविका कमल घोलप म्हणाल्या, गेली चार वर्ष झाले आयुक्त हार्डिकर असल्यापासून गरिबांच्या घरासाठी पाठपुरावा करत होतो. हर्डीकर यांनी नकारात्मक भूमिका घेतली तरी आम्ही थांबलो नाही. अखेर राजकीय वारसा नसताना यश मिळाले व नागरिकांना हक्काची घरे मिळाली, याचा आनंद झाला आहे. आयुक्त राजेश पाटील व महापौर माई ढोरे यांचे आभार मानतो. राहिलेल्या नागरिकांच्या घरासाठी लढा हा चालूच राहील.

Share to