हातगाडी, स्टॉल धारकांचे ‘ग’ प्रभागावर आंदोलन
- हक्क मिळवण्यासाठी सामुदायिक मागणी
पिंपरी (प्रतिनिधी) – कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयावर विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. पथारी, हातगाडी, टपरीधारक एकजुटीचा विजय असो, फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करा, कारवाई केल्यास कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, कारवाई थांबवा हक्काची जागा द्या, अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला. वर्किंग पीपल्स चार्टर, कष्टकरी संघर्ष महासंघ तर्फे अनिल बारवकर, राजू बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सलीम डांगे, कमल लष्करे, बाळासाहेब खताळ, ज्योति अग्रवाल, नवनाथ जगताप, अस्मिता होळकर, शुक्लाबाई स्वामी, कालिदास गायकवाड, अशोक जाधव, रवींद्र गायकवाड, राजेंद्र जाधव, कृष्णा पवार, नारायण पवार, गिरिधर मोहिते, विनायक लोखंडे उमेश गायकवाड, मीना सरवदे, आदीसह ग प्रभाग कार्यक्षेत्रातील विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनिल बारवकर म्हणाले की, संसदेने सन २०१४ मध्ये पथ विक्रेता कायदा केला असून याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ती न करता अत्यंत चुकीच्या पद्धतीने महापालिका आयुक्त आणि ग प्रभाग कार्यालयाकडून कारवाई सुरू आहे. कारवाईमध्ये महापालिकेकडून साहित्य जप्त केले जात आहे. कोरोना कालावधीमध्ये दिड वर्षापासून लोकांचा व्यवसाय संपलेला आहे. इकडे कर्जाचे हप्ते तर इकडे अतिक्रमण कारवाई अशामध्ये जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. महापालिकेकडून अनेक वेळा सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. आणि ठराविक लोकांवर कारवाई करायची, ठराविक लोकांना सोडून द्यायचं, असे प्रकार सुरू आहेत. अपंग आणि विधवा महिलांनाही अनेकवेळा या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
यावेळी विविध भागातून आलेल्या विक्रेत्यांनी आपले मनोगत व दुःख आंदोलनामध्ये मांडले. यानंतर ग क्षेत्रीय अधिकारी रविकिरण घोडके यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली, सविस्तर आणि निवेदनाद्वारे आपल्या मागण्यावर लक्ष वेधले. विक्रेत्यांवर कारवाई त्वरित थांबवावी, यापूर्वी न झालेले विक्रेत्यांचे बायोमेट्रिक पूर्ण करावे, नवीन सर्वेक्षणाला गती द्यावी, जोपर्यंत सर्वेक्षण होत नाही, तोपर्यंत कारवाई थांबवावी, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, या मागण्यांचा समावेश होता. यावेळी आयुक्तांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन देत रस्त्याला अडथळा होणार नाही, याची दक्षता विक्रेत्यांनी घ्यावी, असे आवाहन रविकिरण घोडके यांनी केले.