कर्वेनगरमध्ये तलवारीने वार करून तरुणाचा खून, आज होता साखरपुडा

पुणे – आज साखरपुड्याचा कार्यक्रम असतानाच 21 वर्षीय तरुणाचा तलवारीने वार करून निर्घृन खून करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना पुणे येथील कर्वेनगरच्या शक्ती चौकात रविवारी सायंकाळी घडली आहे.  

अनिल राजेंद्र जाधव (वय 21, रा. डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज सोमवारी सायंकाळी त्याचा साखरपुडा होणार होता. अलंकार पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जाधव यांची बहीण एका हॉटेलमध्ये स्वयंपाक करण्याचे काम करते. तीला सोडण्यासाठी तो दुचाकीवरून लक्ष्मीनगर परिसरात आला होता. बहिणीला सोडून घरी परत जात असताना शक्ती चौक परिसरात तिघांनी त्याला अडवले. आणि काही कळण्याच्या आतच त्याच्यावर तलवारीने हल्ला चढवला.

डोक्यावर, खांद्यावर तलवारीने वार झाल्याने अनिलने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोरांनी काही अंतर पाठलाग करून पुन्हा त्याच्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनिलचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी अनिल जाधव यांच्यावर पाळत ठेवून हा हल्ला केल्याचे दिसत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, अनिल जाधव याच्या आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्याला चार बहिणी आहेत. त्यातील तीन बहिणीचे विवाह झाले आहेत. वडिलांसोबत पटत नसल्यामुळे तो आपल्या बहिणीकडे राहत होता, अशी माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली.

Share to