राष्ट्रपती निवडणूक, या उमेदवारांनी दाखल केले अर्ज
दिल्ली / मुंबई – देशात राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमेदवार निवडीवरून चर्चा व बैठकांना सुरुवात झाली आहे.
विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारीसाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र, त्यांनी उमेदवारीला नकार दिला. तसेच सत्ताधारी गोटातही उमेदवाराच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे.
तर, दुसरीकडे ११ जणांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये डॉ. के. पद्मराजन सीलम (तामिळनाडू) जीवन कुमार मित्तल (दिल्ली) मोहम्मद ए हामिद पटेल (महाराष्ट्र) सायरा बानो (महाराष्ट्र) टी. रमेश, नमक्कल (तामिळनाडू) श्याम नंदन प्रसाद (बिहार) प्रा. दयाशंकर अग्रवाल (दिल्ली) ओम प्रकाश खरबंदा (दिल्ली) लालू प्रसाद यादव (बिहार) ए. मणिथन (तामिळनाडू) डॉ. मंदती तिरुपती रेड्डी (आंध्र प्रदेश) यांचा समावेश असून यांच्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.
दरम्यान, १८ जुलै रोजी होणार्या १६ व्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे.या अधिसूचनेनुसार २९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून ३० जून रोजी कागदपत्रांची छाननी होणार आहे. तसेच निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची शेवटची तारीख २ जुलै आहे. तर १८ जुलै रोजी निवडणूक होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.