10 मार्चनंतर राज्यात राजकीय भूकंप, चंद्रकांत पाटील यांनी केले भाकित
पुणे – देशभर सध्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. आगामी ५ राज्यांत निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजप, कॉंग्रेस, आप आणि तृणमूल कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी आरोप प्रत्यारोप करत आहेत. येत्या 14 फेब्रुवारीला गोव्यात मतदान होत असून घरोघरी जाऊन सर्वच सर्वच पक्ष प्रचार करण्यावर भर देत आहेत.
यानंतर या राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल. १० मार्चनंतर महाविकासआघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पाटील यांनी आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले, यावेळी ते बोलत होते.