ऋतुप्रमाणे राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांमुळे नागरिकांची दिशाभूल – संतोष सौंदणकर
- कुठे गेली महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु-प्रिंट ?
- मुख्यमंत्री व राऊत यांच्यावरील आरोपाचा काढला वचपा
पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं वक्तृत्व अतिशय चांगलं आहे. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या मनावर त्यांच्या भाषणाची छाप पडते. परंतु, त्यांची राजकीय भूमिका ही नैसर्गिक ऋतूप्रमाणे सतत बदलत असते. कधी विकासाची ब्लु-प्रिंट घेऊन समोर आणली जाते. कधी टोल नाके बंद करण्याचा मुद्दा तर कधी परप्रांतिय हटावचा प्रश्न घेऊन ते समाजापुढे येत असतात. कधी पंतप्रधान मोदी यांच्यावरील टीका तर कधी त्यांचे कोडकौतुक या त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे नागरिकांची दिशाभूल होत असून, उद्या विरोधकांकडूनच त्यांच्याच ‘लाव रे तो व्हिडीओ’ ची नक्कल करण्याची वेळ येऊ नये, अशी टिका शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी केली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेऊन शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर टिका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सौंदणकर यांनी राज ठाकरे यांच्या टिकेचा समाचार घेतला. त्यांच्या टिकेला सौंदणकर यांनी टिकेनेच प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्या सततच्या बदलत्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत करत सौंदणकर यांनी निशाना साधला आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषण शैलीचे कौतुक देखील केले आहे. लोकांच्या मनावर भाषणाची कशी छाप पडते हे सांगितले असले, तरी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या टिकेचा वचपा देखील काढला आहे.
संतोष सौंदणकर म्हणाले की, राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाचे समाजात कौतुक होते. त्या तोडीची त्यांची भाषण शैली आहे. हे नाकारून चालणार नाही. परंतु, त्यांच्या काही भूमिका अत्यंत चुकीच्या ठरत गेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु-प्रिंट आणली होती. ती कुठे गेली हे सामान्य नागरिकांना कळले सुध्दा नाही. महामार्गावर दिवसाढवळ्या नागरिकांची लूट करून कोट्यवधी रुपये लाटणा-या धनाडग्यांचे टोलनाके बंद करण्याची त्यांची भूमिका सुरूवातीला कौतुकास्पद वाटली. मात्र, त्यातून त्यांनी माघार घेतल्यामुळे नागरिकांची टोल नाके बंद होण्याची जी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही.
राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे मनोरंजनाचे व्यासपीठ
मुंबईसह महाराष्ट्रातील परप्रांतियांना बाहेर काढण्याचा त्यांनी निश्चय केला होता. त्याचे पुढे काहीही झाले नाही. सरकारी नोकरीत मराठी तरुणांचा सहभाग असेल अथवा मराठी पाट्या असतील किंवा बॅंकांमध्ये मराठीचा वापर करण्याचा मुद्दा असेल असे कित्येक मुद्दे घेऊन त्याची पुर्तता करणे त्यांच्याकडून शक्य झाले नाही. त्यामुळे राज ठाकरे हे केवळ भाषणापुरते मर्यादीत राहिलेले नेतृत्व वाटते. त्यांची भूमिका ही नैसर्गिक ऋतुप्रमाणे सतत बदलत असते. निसर्गाचे जसे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा असे ऋतुमान आहे. तशी राज ठाकरे यांची भूमिका ऋतुप्रमाणे बदलत असते. त्यामुळे त्यांची आश्वासने व भाकिते नागरिकांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना दिशाभूल करणारी ठरत आहेत. त्यातून नागरिकांचे हीत साध्य होत नसल्यामुळे त्यांच्या सभा केवळ मनोरंजनाचे व्यासपीठ बनले आहे, अशी टिका सौंदणकर यांनी केली आहे.
मनसेकडून उठसुठ शिवसेना व उद्धव साहेबांवर टिका केली जातेय. त्याच उद्धव साहेबांनी 63 आमदार देखील निवडून आणलेत; ते मात्र येथे सोयीस्करपणे विसरतात. स्वतःच्या पक्षाची एकेकाळी 14 आमदारांची फौज दिमतीला होती, ती आता फक्त एकवर येऊन स्थिरावली आहे. याची लाज बाळगायला हवी. मात्र, राजसाहेब उंटावरून शेळ्या हाकण्यातच धन्यता मानतात. याच कारभाराला वैतागून पक्षाचा एक-एक मनसैनिक पक्ष सोडून जाताना दिसतोय. यावर राजसाहेबांनी आत्मचिंतन करायला हवे; मात्र ते होताना दिसत नाही. हीच मनसेची खरी शोकांतिका आहे.
– संतोष सौंदणकर (शहर शिवसेना)