मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पुण्य पदरात पाडून घ्यावे… मनसेची शिवसेनेवर सडकून टिका
मुंबई – छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे. असं म्हणत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अखेर आज शिवसेनेकडून आपला उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केल्याची बातमी देण्यात आली. संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ती फोल ठरली आहे. दरम्यान शिवसेनेने संभाजीराजेंना डावलल्यानंतर मनसेने जाहीर पाठिंबा दिला आहे. तसंच शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे. असं म्हणत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. राजू पाटील यांनी ट्विट केले आहे की,’राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी ? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का ? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे.’ असेही पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संभाजी राजे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सशर्त उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती. संभाजीराजे यांनी शिवसेनेकडून लढावे ही अट त्यांना घालण्यात आली होती. मात्र ती त्यांनी मान्य केली नसल्याची कालची बातमी होती. त्यानंतर अखेर आता आपल्या कट्टर शिवसैनिकालाच रिंगणात उतरवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.