कृत्रिम पाणीटंचाईच्या निषेधार्थ मनसेचे पालिकेसमोर तीव्र आंदोलन

पिंपरी  : पिंपरी चिंचवड शहरातील कृत्रिम पाणीटंचाईच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समोर आंदोलन केले. तसेच, प्रशासकीय कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली. यावेळी कृत्रिम पाणीटंचाईच्या भस्मासुराचा मनसेच्या वतीने वध करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरात भर पावसाळ्यात पालिका प्रशासनाकडून कृत्रिम पाणीबाणी सुरु आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविणारी महापालिका शहरवासियांना पुरेसे पिण्याचे पाणी देऊ शकत नसेल तर, त्याचा कारभार हाकणारे प्रशासन याला जबाबदार आहे, असे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी म्हटले.

तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तांत्रिक कारणे सांगत, अल्प काळासाठी २५ नोव्हेंबर २०१९ पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. त्यांनतर नियमित पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन दिले होते. आज जवळपास अडीच वर्ष उलटले तरी ‘दिवसाआड’ पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर कायम आहे. शहरात नियमित आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा केव्हा होणार ? याचा खुलासा करा, असेही चिखले म्हणाले.

आंद्रा व भामा आसखेड धरणातून १०० एमएलडी पाणी महिनाभरात देण्याचे आश्वासन आपण दिले होते. त्याचे पुढे काय झाले?. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची मुदत संपून अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही. तुम्ही ठेकेदारावर काय कारवाई केली? याचाही खुलासा करा. जमत नसेल तर खुर्ची खाली करा.

मनसे आपणासह प्रशासनाला केवळ आठ दिवसांचा अल्टीमेट्म देत आहे. आठ दिवसात शहरातील कृत्रिम पाणीटंचाई आपण दूर शकला नाहीत तर, आपणासह सर्व प्रशासकीय यंत्रणेला शहर मनसे ‘ पळता भुई थोडी करील ‘. बाकी काही सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. आपण सुज्ञ आहात. या निवेदनाची आपण वेळेतच दखल घेऊन नागरिकांना नियमित पाणी देऊन दिलासा द्याल, अशी अपेक्षा चिखले यांनी व्यक्त केली.

Share to