रहाटणी, पिंपळे सौदागरचा पाणी पुरवठा सुरळीत करा – मा. नगरसेवक नाना काटे
पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) – रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी केली आहे.
यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे, त्यात काटे यांनी म्हटले आहे की, प्रभाग २८ रहाटणी पिंपळे सौदागर परिसरात गेली कित्येक दिवस कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.
महानगरपालिकेतर्फे दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय तो पण अपुरा व कमी दाबाने, तसेच या परिसरात सोसायटी संख्या जास्त असून कमी व अपुऱ्या होणार्या पाणी पुरवठ्यामुळे सोसायटीना खासगी टॅकर मागवावे लागत आहे. अश्याने सोसायटी धारकांना आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत असून लाखो रुपये कर भरून सुद्धा महानगरपालिका पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात करू शकत नसल्याने नागरिकांच्या दररोजच्या तक्रारींच्या रोषास लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाचा अधिकारी व कर्मचारी यांना विचारले असता टाळाटाळ केली जाते उडवा उडवीची उत्तरे दिली जातात.
पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे गेली एक वर्ष झाले पाण्याची टाकी बांधून तयार झालेली असून आजपर्यंत या टाकीवरून सोसायट्याना अद्याप पाणीपुरवठा चालू केलेला नाही. मार्च महिना चालू होऊन पंधरा दिवस झालेले आहेत, उन्हाळा सुरु झालेला आहे. त्यातच दिवसाआड पाणी आणि तो ही कमी दाबाने असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत तरी आयुक्त साहेब त्वरित रहाटणी पिंपळे सौदागर मधील नागरिकांची पाणी समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.