जातीय हत्याकांडातील आरोपींना अटक करा
– सामाजिक संघटनांचे इस्लामपूर तहसीलदारांना निवेदन
सांगली : प्रतिनिधी
नांदेड, मुंबई आणि लातूर येथे जातीयवादी मानसिकतेतून हत्याकांड घडले आहेत. या मधील आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने करण्यात आली. इस्लामपूरचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली.
या वेळी अरुण कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे, माजी सभापती शैलेश सूर्यवंशी, दीपक कांबळे, ऍड. दादासाहेब कांबळे, मनोज राजवर्धन, धीरज कांबळे, किशोर कांबळे, दत्ता कांबळे, दिनकर सूर्यगंध, दिनकर बोकणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात नमूद केले की, नांदेड येथील बोंडार या गावातील अक्षय भालेराव या तरुणाचा जातीयवादातून खून करण्यात आला. या बरोबरच मुंबई चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले महिला वस्तीगृहात इंजिनिअरिंग शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा अत्याचार करून खून करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील रेनपुर गावातील मातंग समाजातील मुलाचा पैसे घेतल्या कारणाने खून करण्यात आला. या सर्व घटना जातीयवादी मानसिकतेतून घडल्या आहेत. या मधील आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.
——————————–
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
– मो. नं – 7350266967