तरुण पिढी उद्ध्वस्त ; महिलांनो बाटली आडवी कराच !
– ऐतवडे बुद्रुक मध्ये दारूबंदीसाठी रणरागिणी सरसावल्या
सांगली ! प्रदीप लोखंडे
हाताला काम नाही…डोक्यावर कर्जाचा बोजा…तरुण व्यसनांच्या आहारी…घरोघरी, चौकाचौकात वाढणारी भांडणे…बायका पोरांच्या वाट्याला आलेला दुःखाचा डोंगर…यासह अनेक प्रश्न निर्माण होण्याचे कारण दारू ठरत आहे. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुकसह (ता. वाळवा, जि. सांगली) आजूबाजूच्या परिसरात हे चित्र दिसत आहे. दारू विक्री अधिकृत असो अथवा अनधिकृत. त्यामधून आजची तरुण पिढी स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करून घेत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे दारू आणि त्याची विक्री गावातून हद्दपार करण्याचा योग्य आणि कौतुकास्पद निर्णय ऐतवडे बुद्रुकच्या महिलांनी घेतला आहे. दारूमुळे उध्दवस्त होणारे आपल्या भावाचे, पतीचे आणि वडिलांचे आयुष्य सावरण्यासाठी राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई, माता रमाईच्या या रणरागिणी दारू बंद व्हावी यासाठी सरसावल्या आहेत. सध्याचे व्यसनांचे हे चित्र पाहता महिलांनो उभी बाटली आडवी कराच, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारी दरम्यान ऐतवडे बुद्रुक मध्ये महिला ग्रामसभा पार पडली. या मध्ये आपल्या सुखी कुटुंबात दुःख घेऊन येणारा मिठाचा खडा असणाऱ्या दारूला हद्दपार करा, अशी व्यथा महिलांनी मांडली. ज्याच्या घरात दारू पिणारे आहेत त्यांचं दुःख जाणून घ्या, अशी आर्त हाक महिलांनी या ग्रामसभेत घातली. त्याला बहुतांश महिलांनी सकारात्मक प्रतिसाद देत दारू बंदी झालीच पाहिजे, असे हात उंचावून सांगितले. महिलांच्या या आवाहनाला साथ देण्यासाठी तरुणांचे प्रतिनिधित्व करणारे उपसरपंच संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे, जगन्नाथ साळुंखे, अजिंक्य पाटील, प्रकाश कदम हे तरुण पुढे आले.
राजकारण त्या त्या वेळी होईल. मात्र महिलांचा त्रास कमी झाला पाहिजे, यासाठी हे तरुण गावागावात फिरून दारूबंदी विषयी जनजागृती करत आहेत. ठरावावर महिलांच्या सह्या घेत आहेत. गावात एकूण १ हजार ९५६ महिला मतदार आहेत. त्यापैकी हयात नसणारे आणि बाहेर असणारे असे वगळून सुमारे १ हजार २०० महिलांच्या म्हणजे जवळजवळ सर्वच महिलांच्या दारूबंदी साठी सह्या झाल्या असल्याची माहिती उपसरपंच संदीप गायकवाड आणि ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे यांनी दिली. सह्यांचे पत्र आणि निवेदन सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले जाणार आहे. या विभागाकडून वाळवा तहसीलदारांना पुढील कार्यवाही बाबत कळविले जाणार आहे. त्यानंतर गावात दारूबंदीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे.
दारूबंदीसाठी कोण पुढे आले ? श्रेय कोणाला मिळेल ? कोणाविरोधात हे चालू आहे का ? या चर्चा एका बाजूला रंगत आहेतच. मात्र तरीही दुसऱ्या बाजूला दारू बंदीचा घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य ? याचा विचार सुशिक्षित, निर्व्यसनी तरुणांनी करायला हवा. या बरोबरच आपल्या व्यवसायामुळे अनेक महिलांच्या दुःखाचे आश्रु बनत असू, तर हा व्यवसाय सोडून देण्याचा आग्रह देखील व्यवसाय करणाऱ्यांनी देखील तितकाच सामंजस्यपणाने घ्यायला हवा. तसे झाले तर त्याचे स्वागतच केले जाईल आणि लोकांच्या चेहऱ्यावरील हसुचे समाधान देखील मिळेल.
हे सगळ असले तरी प्रत्यक्ष निकालादिवशी काय चित्र असेल हे त्यावेळी समजेल. ऐतवडे बुद्रुक ही थोर समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच कर्मवीर आण्णांची भूमी आहे. कर्मवीर आण्णा यांचा वारसा लाभलेल्या या क्रांतिकारी ऐतवडे बुद्रुकच्या भूमीत महिलांनी केलेला निर्धार आणि त्याला दिली जाणारी तरुणांची साथ कौतुकास्पद आहे. उभी बाटली आडवी (दारूबंदी) झालीच तर ऐतवडे बुद्रुक मधील महिलांच्या या लढ्याचा आदर्श इतरही गावे घेतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होण्यापासून बचाविण्याचे पुण्य कर्म होईल हे मात्र नक्की !
—————————————-
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
– मो. नं : 7350266967