गल्लीत निर्माण झालेल्या टग्यांना कोण आवरणार ?
– कुरळप पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली
सांगली ! प्रदीप लोखंडे
तोंडात गुटखा अन् मावा..गांजाची झिंग..सिनेमातील हिरो स्टाईलने भांडण करण्याची उर्मी घेऊन सद्या वाळवा तालुक्यात (जि. सांगली) गल्लोगल्ली भाई, दादा आणि टग्या तयार झाले आहेत. पोलिसांचा धाक न राहिल्याने दिवसाढवळ्या हाणामारीच्या प्रकरणांत वाढ होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून सांगलीच्या वाळवा तालुक्यात असणाऱ्या कुरळप पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. मात्र वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात कुरळप पोलिसांना मात्र अपयश येताना दिसत आहे.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन बनली आहे. दारू, मावा, गुटखा खाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. याच्या सोबत गांजा देखील ओढला जात आहे. या व्यसनांची झिंग डोक्यात घेऊन प्रत्येक गावातील तरुणांचे टोळके रस्त्याने हिंडत आहे. परिणामी छोट्या छोट्या कारणांवरून भांडण करण्याचे धाडस त्यांचे वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेषत कोरोनानंतर या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. हाणामारीच्या गंभीर घटना देखील गावागावात घडत आहेत. एका घटनेकडे कोणी लक्ष न दिल्यास अशा प्रकारचे अनेक गुन्हे करण्याचे धाडस नवीन भाई बनलेल्यांची होत आहे. दिवसाढवळ्या शिवीगाळ करणे, हाणामारी करणे अशा घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र नाराजीचा सूर ओढत आहेत. या घटनांना आळा कोण घालणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
कुरळप (ता. वाळवा) पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना वाढल्या आहेत. नवीन होऊ पाहणाऱ्या टग्यांवर धाक दाखविण्याकडे पोलिस प्रशासन देखील कानाडोळा करताना दिसत आहे. परिणामी गुन्हेगारी वाढतानाच दिसत आहे. पोलिसांनी योग्य वेळी आपली खाकी दाखवली तर याला आळा बसेल. मात्र पोलिसांच्या कारवाई बाबत असणाऱ्या उदासीनतेमुळे गल्लीतील हे टगे मात्र सुसाटच आहेत. भविष्यात एखाद्या मोठ्या घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग येणार का ? असा प्रश्न गावागावातील नागरिक उपस्थित करत आहेत. या बाबत पोलिस प्रशासन गंभीरपणे दखल घेईल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आहे.
गुन्हे दाखल करून कडक कारवाई हवी –
हाणामारीच्या घटना घडल्यास अथवा गुन्हेगारीशी संबधित तक्रारी आल्यास त्या त्वरित दाखल करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. तरच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसणार आहे. कारवाईकडे दुर्लक्ष केले अन गुन्हेगारीला खतपाणी घातले तर नवीन टग्यांची कॉलर मात्र कायम टाईटच राहील, अशी परिस्थिती आहे.
——————————————
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
– मो. नं – 7350266967