आर्थिक संकटात सापडल्याने बीड जिल्ह्यात तीन शेतक-यांची आत्महत्या
बीड – अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दोन दिवसांमध्ये 2 तरुण शेतकऱ्यांसह एका वृद्ध शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत. बीड जिल्ह्यातील केज, वडवणी आणि परळी तालुक्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
बाळासाहेब रामलिंग गित्ते (वय 25 वर्ष, रा. साळेगाव ता. केज) याने 19 तारखेला आत्महत्या केली. तर सिद्धेश्वर धर्मराज फरताडे (वय 34 रा. खळवट लिंबगाव ता. वडवणी) याने काल 20 तारखेला सकाळी व नागोराव धोंडिबा शिंदे (रा. देशमुख टाकळी ता. परळी) यांनी काल सायंकाळी उशिरा आत्महत्या केली.
अतिवृष्टीने मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालं आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरी शासनाची मदत पोहोचली नाही. केवळ पंचनाम्याचा फार्स आणि आश्वासनांची खैरात या प्रशासन आणि सरकारमधून दिली जात आहे. यामुळे इथला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळं जगावं कसं ? या द्विधा मनस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांकडून, आता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे.
अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आलाय, रब्बीचा हंगाम सुरू होत आहे, यामुळे आता येणारा सणवार कसा करावा ? घेतलेलं कर्ज कुठून फेडावं ? रब्बीसाठी बियानं कुठून आणावं ? वाहून गेलेलं शेत पुन्हा कसदार कसं बनवावं ? या एक ना अनेक संकटाने इथला शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.