मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्याला नारळ देऊन घरी पाठवण्याचा ताठ बाणा ठेवावा – आशिष शेलार
मुंबई – “राज्याची बदनामी होऊ नये असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर ज्या मंत्र्याचा जावई गंजेडी म्हणून पकडला, त्या मंत्र्याला लाथ मारून मुख्यमंत्र्यांनी हाकलला पाहिजे. राज्याची बदनामी अशा मंत्र्यांमुळे होते”, असा आरोप भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. राजभवनवर राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
ड्रग्ज प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शेलार यांनी नवाब मलिक आणि उद्धव ठाकरे या दोघांवर निशाणा साधला.
“दारू आणि गुत्त्याच्या वसूलीत अधिकारी लावले जातात. त्यानंतर अधिकारी पोपटपंचीसारखं बोलतात. यातून राज्याची बदनामी होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो, की देशाप्रमाणेच राज्यातही कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य अपेक्षित आहे. पण राज्य सरकारचा नारा वेगळा दिसतोय. स्वत: काम करायचं नाही आणि कुठल्या यंत्रणांना काम करून द्यायचं नाही”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
“एक मंत्री सकाळ-संध्याकाळ उठून कुठलातरी तंबाखू घेतल्यासारखं बोलतोय. मंत्री महोदयांनी शपथ कशाची घेतलीय, ते करतायत काय ? कायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात रोज तुम्ही बोलतायत. त्या मंत्र्याला नारळ देऊन घरी पाठवण्याचा ताठ बाणा उद्धवजी तुमच्याकडून अपेक्षित आहे”, असं आशिष शेलार म्हटले आहे.