‘तत्कालीन पालकमंत्र्यांना जोड्याने मारलं पाहिजे’, अजित पवारांचे नाव न घेता उदयनराजेंची टिका

पुणे – साता-यातील क्रीडा संकुलावरून उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांचे नाव न घेता त्यांना मुस्काडले पाहिजे, असे उद्यनराजेंनी म्हटले आहे. मी नाही मी नाही म्हणणाऱ्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचं वाटोळं केलं. शाहू स्टेडियम हे क्रीडा संकुल करायचे सोडून त्याचे व्यापारी संकुल केल्याचा आरोप देखील उदयनराजेंनी केला आहे.

क्रीडा अधिकाऱ्यांच्या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी काही वर्षापूर्वी बनवलेल्या क्रीडा संकुलाबाबतही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “अ‍ॅथेलिटीक ट्रॅक हे आयताकृती लागते ते तर गोल आहे. जोड्याने मारलं पाहिजे ज्या पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी मला विरोध केला आणि दाखवले की मी कारण नसताना विरोध करत आहे. हे कोणी केले आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे नाव घेतले तर माझ्या तोंडातून घाण वास मारेल म्हणून मी नाव पण घेत नाही. हे लोक जोड्यापुढे उभे करायच्या लायकीचे नाहीत. सगळीकडे घाण. साधे तुम्ही रणजी ट्रॉफीचे सामने घेऊ शकत नाहीत. यांनी सातारकरांनी संपूर्ण झिरो करायचेच ठरवले आहे. त्याला आयताकृती मैदान लागते कुठून करायचे?” असा सवाल उदयनराजेंनी केला आहे.

“त्याकाळी रणजी ट्रॉफी शाहू स्टेडियमवर भरवल्या जात होत्या. मात्र, आता भरवता येत नाहीत. ज्या बी. जी. शिर्के यांच्यासारख्या व्यक्तींनी बालेवाडी स्टेडियम बनवले, अशा मोठ्या उद्योगपतीने या ठिकाणी टेंडरसाठी अर्ज भरले होते. त्यांना नाकारले. हे सर्व समोर येणे गरजेचे आहे. यामधून ही सर्व आमदार-खासदार माकडे आहेत. त्यांनी बोध घ्यायला हवा. त्यावेळच्या साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावे. प्रत्येक वेळेस मी नाही असं सांगितलं जातं यांना जोड्याने मारलं पाहिजे. स्टेडियमचे टेंडर काढले असताना स्टेडियमच्या बाहेरून गाळे कशे बनवले” अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

Share to