समीर वानखेडे प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, तक्रार दाखल होताच कारवाई – दिलीप वळसे पाटील

पुणे – मुंबई ड्रग्स प्रकरणात आता प्रभाकर साईल यांच्या एका व्हिडीओमुळे समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. या प्रकरणात 25 कोटीची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत अधिक आक्रमक झाले आहेत. तर साईल यांनी केलेल्या मागणीनुसार मुंबई पोलिसांकडून त्यांना संरक्षण देण्यात आलं आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करु, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

या प्रकरणात आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचं अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं होतं. त्याबाबत विचारलं असता. नवाब मलिक यांची आणि माझी भेट झालेली नाही. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं म्हणणं समजून घेऊन पुढील कारवाई करु, असं गृहमंत्री म्हणाले. तसंच कारवाई करण्यासाठी कुणीतरी तक्रार दाखल करायला हवी. तशी तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही कारवाई करु, असंही वळसे-पाटलांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा असा वापर कधीही झाला नव्हता. आता जास्त वापर होतोय. सरकार आणि राजकीय व्यक्तींना वेठीस धरलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केलीय.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पहिला धक्का बसला आहे. प्रभाकर साईल याने केलेले आरोप ग्राह्य धरु नये, यासाठी वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हायकोर्टात प्रकरण असल्यामुळे सुनावणीला सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Share to