कोरोनाचे देशातील सर्व निर्बंध हटवणार, केंद्र सरकारची घोषणा

मुंबई – संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या करोनाचा देशात प्रादुर्भाव  आता कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे. 31 मार्चपासून देशातील सर्व करोना निर्बंध हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनी देशातील जनता निर्बंधमुक्त  होणार आहे.  पण, मास्क, सोशल डिस्टन्सिगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

देशातील दैनंदिन करोनाबाधितांच्या आकड्यात लक्षणीय अशी घट झाल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात देशात 2 हजार 542 लोक करोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 87 वर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील करोनारुग्णांची संख्या कमी होत आहे.  आयआयटी कानपूरच्या अभ्यासात जूनमध्ये करोनाची चौथी लाट येणार असल्याचे समोर आले आहे. पुढील तीन महिन्यानंतर करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळू शकते. पण लसीकरणामुळे रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे अथवा मृत्यूचं प्रमाण खूप कमी असेल.

करोना विषाणूचा नवीन व्हेरियंट आल्यास मात्र करोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अन्यथा चौथी लाट आली तरी ती सौम्य असेल.

Share to