ऐतवडे बुद्रुक गावचे वाढले ‘पॉलिटिकल मायलेज’
– जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीवर नवीन नेतृत्वांना मिळतेय संधी
– प्रताप घाटगे, अर्चना खटावकर, उदय गायकवाड यांच्यासह अनेकांची वर्णी
महाईन्युज : प्रदीप लोखंडे
सामाजिक आणि राजकीय कामात अग्रेसर राहिल्याने विविध राजकीय पक्षांच्या जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीवर काम करण्याची संधी ऐतवडे बुद्रुक मधील नवीन नेतृत्वांना मिळत आहे. प्रताप घाटगे, अर्चना तुकाराम खटावकर, तुकाराम खटावकर, उदय गायकवाड, महेश कांबळे आदींची भाजपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे. या निवडीमुळे ऐतवडे बुद्रुक गावचे सांगली जिल्ह्यात आणि विशेषत: वाळवा, शिराळा विधानसभा मतदारसंघात ‘पॉलिटिकल मायलेज’ (राजकीय वजन) वाढल्याचे चित्र आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यभर सर्व जाती-धर्मातील गोरगरिबांच्या घरात शिक्षणाची ज्ञानगंगा पोचविणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची जन्मभूमी असलेले ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा, सांगली) गाव आहे. सुमारे सात हजाराहून अधिक गावची लोकसंख्या आहे. चिकुर्डे आणि कामेरी जिल्हा परिषद गटात सर्वात मोठे गाव असल्याने उमेदवारांचे या गावावर विशेष लक्ष असते. तर गावची लोकसंख्या मोठी असल्याने पंचायत समिती गणात या गावातील उमेदवारालाच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत आहे. याबरोबरच राजकीय आणि सामाजिक कामात सातत्याने अग्रेसर राहिल्याने अनेकांची विविध पक्षांच्या जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीवर काम करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
नुकतीच युवा नेतृत्व प्रताप घाटगे यांची भाजपा युवा मोर्चाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गावातील प्रत्येक तरुणांशी घाटगे यांचा सलोख्याचा संपर्क आहे. स्पर्धा परीक्षा बाबत तरुणांमध्ये जनजागृती, विविध उपक्रमात ते अग्रेसर आहेत. भाजपाचे नेते सत्यजित देशमुख यांच्या अत्यंत जवळचे ते मानले जातात. या बरोबरच अनेक राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. या बरोबरच उदय गायकवाड या तरुणाला माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या वाळवा तालुका पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी संधी मिळाली आहे. राजकीय पार्श्वभूमी नसतानाही पक्षाने संधी देत गायकवाडला ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे.
या पूर्वी अर्चना तुकाराम खटावकर यांची भाजपाच्या सांगली जिल्हा (ग्रामीण) कार्यकारिणीत सदस्य पदावर संधी मिळाली आहे. तुकाराम खटावकर यांची भाजपाच्या वाळवा तालुका पश्चिम विभागात शक्ती केंद्र प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. खटावकर यांनी गावात आपला दांडगा जनसंपर्क तयार केला आहे. भाजपाचे नेते राहुल आणि सम्राट महाडिक यांचे ते अत्यंत निष्ठावान मानले जातात. खटावकर यांनी महाडिक पतसंस्था, आरोही दूध संकलन केंद्राचा यशस्वी कारभार उभारून दाखविला आहे. तर वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीवर महेश कांबळे यांची देखील वर्णी लागली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या माध्यमातून महेश कांबळे सक्रिय राहिले. त्यांचा गावात मोठा मित्र परिवार आहे. गावातील वार्ड क्रमांक दोन मधून विजय प्राप्त करत सद्या ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
एकूणच गावात तरुणांची झालेली एकी. राजकीय समज वाढल्याने अनेक जण सामाजिक आणि राजकीय कामात अग्रेसर होताना दिसत आहे. त्याची दखल देखील वरिष्ठ पातळीवर घेतली जात आहे. याचा परिणाम म्हणूनच विविध पदांवर गावातील तरुण नेतृत्व काम करताना दिसत आहेत. या मुळे गावच्या विकासात भर पडेल असे चित्र सद्या तरी दिसत आहे.
———————————–
– प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज
– मो. नं : 7350266967